भारतातील बहुतांश शेतकरी छोटे व मध्यम आहेत आणि त्यांच्याकडे काढणीपश्चात साठवणूक (post-harvest storage ) करण्याची सोय फारच मर्यादित आहे. शेतमालाची बाजारात नेण्याची घाई, योग्य दर न मिळणे, वीजेचा अभाव आणि महागड्या कोल्ड स्टोरेज (cold storage) ची अनुपलब्धता ही ही सगळी कारणं मिळून दरवर्षी ३० ते ३५% फळे व भाजीपाला वाया जातात (संदर्भ: ICAR).
या पार्श्वभूमीवर एक सोपा, कमी खर्चाचा आणि ग्रामीण भागासाठी योग्य असा उपाय म्हणजे – झिरो एनर्जी कूल चेंबर (Zero Energy Cool Chamber)!
झिरो एनर्जी कूल चेंबर म्हणजे काय?
झिरो एनर्जी कूल चेंबर (ZECC) हा एक छोटा साठवणूक कक्ष आहे, जो स्थानिक पातळीवर विटा, वाळू आणि गोणपाट वापरून तयार केला जातो. याला वीज लागत नाही आणि थंडी तयार करण्यासाठी पाण्याच्या बाष्पीभवन (evaporation) या नैसर्गिक प्रक्रियेचा उपयोग केला जातो.
हा चेंबर भारतीय कृषी अनुसंधान संस्था (IARI), नवी दिल्ली यांनी तयार केला आहे (संदर्भ: Roy & Khurdiya, 1986).
झिरो एनर्जी कूल चेंबरचे काम कसं करतं?
या चेंबरमध्ये दुहेरी भिंती असतात आणि त्या दोन भिंतींमधील जागा वाळूने भरलेली असते. या वाळूमध्ये दररोज दोन वेळा पाणी शिंपडले जाते. पाण्याचे बाष्पीभवन झाल्यामुळे या खोलीचे तापमान बाहेरच्या तुलनेत १०–१५ अंश सेल्सिअसने कमी राहते आणि सापेक्ष आर्द्रता (Relative Humidity) ९०% पर्यंत राहते.
ही स्थिती फळे आणि भाजीपाला ताजे ठेवण्यासाठी अगदी योग्य असते.
याचे मुख्य फायदे:
१. वीज लागत नाही
झिरो एनर्जी कूल चेंबर कार्य करण्यासाठी कोणत्याही प्रकारची वीज लागणार नाही. त्यामुळे विजेच्या भारनियमनाचा (load shedding) किंवा बिलाचा त्रास नाही.
२. कमी खर्चात बांधणी
सुमारे ₹२५००–३००० खर्चात एका १०० किलो क्षमतेच्या ZECC चे बांधकाम करता येते (संदर्भ: Dadhich et al., 2008). यासाठी लागणारी सामग्री सर्वसामान्यतः स्थानिक पातळीवर मिळते.
३. साठवणुकीचा कालावधी वाढतो
ZECC मध्ये फळे व भाज्यांचा ताजेपणा ३ ते ५ दिवसांनी वाढतो, काही वेळा तर १० ते १४ दिवसांनीसुद्धा (संदर्भ: Singh & Satapathy, 2006).
उदा. टोमॅटोचे आयुष्य खोलीत ४ दिवस असते, पण ZECC मध्ये ११ ते १८ दिवसांपर्यंत वाढते (संदर्भ: Mordi and Olorunda, 2003).
४. वजन कमी होणे कमी होते
ताज्या भाज्या व फळांचे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, त्यामुळे तयार विक्रीसाठी वजन टिकून राहते.
५. पर्यावरणपूरक
कोणतेही रेफ्रिजरंट वापरले जात नाही, त्यामुळे ओझोन थराला धोका नाही, आणि प्रदूषणही होत नाही.
कोणासाठी योग्य?
- छोटे व मध्यम शेतकरी
- भाजीविक्री करणारे
- महिला बचतगट व स्वयंरोजगार करणारे
- ग्रामीण भागातील शाळा, संस्था व कृषी केंद्रे
बांधकाम कसं करावं?
साहित्य: साधारण ४०० विटा, नदीची वाळू, गूणपाट, बांबू किंवा काठी, पाणी.
पद्धत:
- एक समांतर चौरस प्लॅटफॉर्म विटांनी तयार करा.
- दोन भिंतींचा दरम्यान ७.५ से.मी. जागा ठेवून दोन्ही बाजूंच्या भिंती बांधा.
- त्या जागेत वाळू भरून ठेवा आणि पूर्ण भिंती ओल्या करा.
- वरच्या बाजूस ओलसर गोणपाटाने झाकण तयार करा.
- दररोज सकाळ-संध्याकाळ पाणी शिंपडणं आवश्यक.
मर्यादा व काळजी:
- सतत पाण्याची गरज असते.
- अधिक दमट हवामानात प्रभावीपणा कमी होतो.
- उच्च प्रमाणातील आद्रतेमुळे काहीवेळा बुरशी होण्याची शक्यता असते.
झिरो एनर्जी कूल चेंबर हा ग्रामीण भागासाठी वरदान ठरू शकतो. यामुळे शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला काही दिवस ताजे ठेवता येतात, बाजारात योग्य वेळ साधता येतो आणि ‘डिस्ट्रेस सेल’ (Distressed sell) टाळता येतो.
हे चेंबर कमी खर्चात, सोप्या पद्धतीने, आणि पर्यावरणपूरक रितीने काम करत असल्यामुळे आजच्या काळात त्याची गरज अधिक आहे. जेथे कोल्ड स्टोरेज (cold storage) शक्य नाही तिथे ही एक आदर्श आणि किफायतशीर साठवणूक यंत्रणा आहे.
संदर्भ:
- Roy & Khurdiya (1986), IARI, New Delhi.
- Dadhich et al. (2008). Journal of Food Science and Technology.
- Mordi and Olorunda (2003). African Journal of Agricultural Research.
- Singh & Satapathy (2006). ICAR Research Complex, Meghalaya.
- ICAR Reports (2022). Indian Council of Agricultural Research.
अधिक माहितीसाठी Evaporative Cooling System for Storage of Fruits and Vegetables – A Review हे संशोधनप्रबंध जरूर वाचा.