Solar water pump

पीएम कुसुम सौर पंप योजना – संपूर्ण माहिती, ऑनलाईन अर्ज कसा करावा

पीएम-कुसुम योजना (PM Kusum Yojna ) हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांमध्ये सौर ऊर्जा निर्मितीला चालना देणे आहे. या योजनेद्वारे, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीवर सौर पंप आणि सौर ऊर्जा संयंत्रे लावण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे त्यांचे पारंपारिक उर्जा स्त्रोतांवरील अवलंबित्व कमी होते आणि शाश्वत कृषी पद्धतींना हातभार लावला जातो. पीएम-कुसुम योजना शेतकऱ्यांना उर्जेचा विश्वासार्ह स्त्रोत देऊन त्यांना केवळ सशक्त बनवत नाही तर हवामान बदलाशी लढा देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेशी सुसंगत राहून अक्षय ऊर्जेचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देते. पीएम-कुसुम योजनेचे तपशील आणि तुम्ही ऑनलाइन अर्ज कसा करू शकता ते पाहू या.

सिंचनाची गरज

पाणी हे कृषी उत्पादनासाठी एक महत्त्वपूर्ण गरज असून पाण्याविना  कृषी उत्पन्न घेण्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. जगभरात एकूण लागवडीखालील जमिनीच्या 20 टक्के शेती सिंचन पद्धतीने  केली जात असून या सिंचीत शेती द्वारा प्राप्त होणारया विविध कृषी उद्पादने जगभरात उत्पादित एकूण अन्नामध्ये 40 टक्के योगदान देतात. केवळ पावसावर आधारित शेती व सिंचित शेती  यात तुलना केल्यास, सिंचित शेती ही सरासरी प्रति युनिट जमिनीच्या दुप्पट उत्पादक ठरते आणि त्यामुळे शेतीची  उत्पादन क्षमता  अधिक  होऊन आणि पिकांत  वैविध्यता येते. महाराष्ट्रात कृषी क्षेत्रापैकी एकूण सिंचन क्षेत्र 44.19 लाख हेक्टर असून  80% क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. आणि जवळपास ७०% शेतकरी अत्यल्प व अल्प भूधारक या वर्गात मोडतात.

सिंचनासाठी अनियमित वीजपुरवठा

शेतीसाठी लागणाऱ्या या पाण्याची गरज भागविण्याकरिता सध्यस्थितीत बरेच शेतकरी विजेद्वारा चालणारे पाण्याचे पंप आणि डिझेल पंपांचा (Electric Water Pump and Diesel Water Pump) वापरतात. पण महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही दुर्गम, मागास भागात देखील आहे आणि अशा ठिकाणी तसेच अन्य ठिकाणी देखील विजेद्वारा चालणारे पाण्याचे पंपचा वापर करणे हे इतके सोपे नाही, त्याला कारण म्हणजे वारंवार होणारी वीज कपात, वीजटंचाई, व लोडशेडिंगची समस्या! आणि त्यामुळे होते काय? तर हा विजेद्वारा चालणारे पाण्याचे पंप वापरणारा शेतकरी हवालदिल होऊन जातो.

पीएम कुसुम आधीच्या योजना / पीएम कुसुम योजनेचा इतिहास

2030 पर्यंत गैर-जीवाश्म इंधन स्त्रोतांपासून (non-fossil fuel sources) स्थापित विद्युत उर्जा क्षमतेचा वाटा 40% पर्यंत वाढवण्यास भारत प्रयत्नरत आहे. तसेच आपल्या मंत्रिमंडळाने सौर उर्जेचे लक्ष्य वाढवण्यास मान्यता दिली आहे. त्यासाठीच केंद्रशासनाद्वारा सुरु करण्यात आली आहे हि पीएम कुसुम योजना ! पीएम कुसुम योजनेअंतर्गत राज्यनिहाय उद्दिष्टे किंवा निधीचे वाटप केले जात नाही कारण ती मागणीवर आधारित योजना आहे. तथापि या योजने अंतर्गत काही टप्पे गाठण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना निधी जारी केला जातो.

या योजनेप्रमाणेच अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरुवात करण्यात आल्या आहेत या योजनांचा एक आढावा घेऊया :

अटल सौर कृषी योजना

महाराष्ट्रात विविध  जिल्ह्यांमध्ये अटल सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. या योजनेतून राज्य सरकारचे  शेतकऱ्यांना 3 वर्षात 1 लाख सौर पंप देण्याचे तसेच 31 जानेवारी 2019 पर्यंत सरकार भाग्यवान शेतकऱ्यांची नावे जाहीर करून  फेब्रुवारी 2019 पासून सौर पंप बसवले जाण्याचे उद्दिष्ट्य होते.

याअंतर्गत  तीन एचपी, पाच एचपी व साडे सात एचपी असलेल्या पंपांचे वाटप करण्यात येत असते. शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरून अनुदानित पंप मिळतात. महाराष्ट्र शासनाच्या अल्पभूधारक आणि दुर्गम भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप देण्याच्या योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक  लाभार्थ्यांना लाभ मंजूर झाला असून त्यांच्या शेतात सौर कृषी पंप कार्यान्वितही झाले आहेत.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीला दिवसासुद्धा  सिंचन करता यावं, याचबरोबर चालण्याची जास्त किंमत (High Running Cost)  असलेल्या डिझेल पंपांचा (Diesel Pump) वापर कमी होऊन शेतकऱ्यांवरचा आर्थिक भार कमी व्हावा. तसेच पर्यावरण प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संवर्धन साधता यावं, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना हा एक उत्तम उपक्रम सुचविण्यात आला, आणि महाराष्ट्र शासनाने  2019 मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली. सौरऊर्जेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना सौर पंप संच उभारणीसाठी ९५% अनुदान देते. या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाचे, पात्र शेतकऱ्यांना १,००,००० सौरपंप प्रदान करण्याचे उद्दिष्ट्य होते. नक्कीच या योजनेतून प्राप्त झालेल्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या या सौर पंपांचा वापर शेतकऱ्यांसाठी अतिशय किफायतशीर ठरेल आणि त्यामुळे त्यांच्यावरचा आर्थिक भार कमी होईल.

प्रधानमंत्री (पीएम) कुसुम योजना / कुसुम सौर पंप योजना

याच योजनांना अधिक बळ देण्यासाठी पुढचा टप्पा म्हणजेच पीएम-कुसुम योजना! होय भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (एमएनआरई /MNRE)  द्वारा  मार्च २०१९ पासून हि योजना सुरु करण्यात आली असून प्रधानमंत्री कुसुम योजना म्हणजेच पीएम कुसुम -प्रधान मंत्री किसान उर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (PM-KUSUM – Pradhan  Mantri Kisan Urja Suraksha evam Utthaan Mahabhiyan) आहे.  पीएम-कुसुम योजनेत खालील घटक आहेत:

घटक-A: शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीवर विकेंद्रित ग्राउंड/स्टिल्ट माउंटेड ग्रिड कनेक्टेड सोलर किंवा इतर अक्षय उर्जा आधारित 10,000 मेगावॅट चे पॉवर प्लांट उभारणे.

घटक-B: 14 लाख स्टँड-अलोन सौर कृषी पंपांची स्थापना.

घटक-C: फीडर लेव्हल सोलारायझेशनसह 35 लाख ग्रिड जोडलेल्या कृषी पंपांचे सौरीकरण 31.03.2026 पर्यंत करणे.

आणि हे तीनही टप्पे यशस्वी रित्या राबविण्याकरिता केंद्र शासनाद्वारा अर्थसहाय्य पुरविण्यात येत आहे.

ही योजना भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारे घटक ब अंतर्गत सौर पंप बसवण्यासाठी 30% सबसिडी देतात. सौर पंपाच्या उर्वरित खर्चासाठी शेतकरी बँकेचे कर्ज देखील घेऊ शकतात. मार्च 2023 पर्यंत, घटक B अंतर्गत 21,741 स्टँडअलोन सौर पंप स्थापित केले गेले आहेत. शेतकऱ्यांसाठी कमी किमतीच्या वित्तपुरवठ्याची उपलब्धता आणि राज्याचा निधी ही या  योजनेच्या अंमलबजावणीतील मुख्य आव्हाने  आहेत. तसं पाहता पीएम-कुसुम योजनेत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ करण्याची आणि डिझेलवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्याची क्षमता आहे. तथापि, योजनेची पूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

या योजनेची महत्वाची उद्दिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

  • सिंचनासाठी डिझेलवरील अवलंबित्व कमी करणे.
  • सौर पंप वापरून सिंचनाचा खर्च कमी करणे
  • शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये पाणी आणि ऊर्जा सुरक्षा.
  • प्रदूषण कमी करणे

पीएम-कुसुम योजनेची वैशिष्ट्ये

  • या योजनेंतर्गत सुरुवातीला, केंद्र सरकारने 1.75 दशलक्ष ऑफ-ग्रीड कृषी सौर पंप वितरित करण्याची योजना आहे.
  • सुमारे 10000 मेगा वॅटचे सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नापीक जमिनीचा वापर केला जाईल.
  • राज्य वीज वितरण कंपन्या (डिस्कॉम्स /DISCOMs) या ओसाड जमिनींवर स्थापित केलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांचा वापर करून निर्माण केलेली अतिरिक्त वीज खरेदी करतील.
  • ही वीज खरेदी करण्यासाठी डिस्कॉम्सला सबसिडीही मिळू शकेल.
  • या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना सौर पंपांवर सुमारे 60% अनुदान मिळू शकेल, जे थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer or DBT) वापरून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाईल.
  • ही अनुदानाची रक्कम केंद्र आणि राज्य सरकारे वाटून घेतील, तर ३० टक्के रक्कम शेतकऱ्यांना कर्ज म्हणून दिली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त 10 टक्के खर्च करावा लागणार आहे.

पीएम-कुसुम योजनेचे फायदे

  • ही योजना ग्रामीण जमीनमालकांना 25 वर्षांसाठी न वापरलेल्या/नापीक जमिनीचा सौर प्रकल्पांसाठी वापर करून उत्पन्नाचा एक स्थिर स्त्रोत प्रदान करेल.
  • लागवड केलेल्या शेतात सौर पॅनेल किमान उंचीपेक्षा जास्त असल्याने शेतकरी पिके घेणे सुरू ठेवू शकतात.
  • यामुळे दिवसा ग्रामीण भार आणि कृषी पंपांसाठी पुरेशी स्थानिक सौर ऊर्जा सुनिश्चित होईल.
  • विकेंद्रित झाल्यामुळे, राज्य उपयोगिता आणि डिस्कॉम्ससाठी ट्रान्समिशन तोटा कमी होईल.
  • ही योजना डिस्कॉम्सला नूतनीकरण करण्यायोग्य खरेदी दायित्वांची पूर्तता करण्यास मदत करेल.
  • सौर पंप सिंचनासाठी डिझेलच्या खर्चात बचत करतील आणि ग्रिड लोड न जोडता विश्वासार्ह वीज पुरवतील, ज्यामुळे 4 वर्षांमध्ये 17.5 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल.
  • कुसुम योजनेंतर्गत, शेतकरी, पंचायत, सहकारी समूह सौर पंप बसवण्यासाठी अर्ज करू शकतात.
  • या योजनेत समाविष्ट असलेली एकूण किंमत तीन श्रेणींमध्ये विभागली गेली आहे ज्यामध्ये सरकार शेतकऱ्यांना मदत करेल.
  • या  योजनेद्वारे अर्जदार शेतकऱ्याला सौर उर्जेवर चालणारे सोलर पंप मिळतात. तसेच अर्जदाराला या सोलर पंपावर तब्बल 90 ते 95 टक्के एवढे अनुदान मिळते म्हणजेच जे शेतकरी कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करतील, त्यांना त्यांना 95 टक्के एवढी मोठी रक्कम माफ केली जाणार आहे. शेतकरयांना केवळ 5 ते 10 टक्के एवढीच रक्कम भरायची आहे, आणि त्याद्वारे मोफत अगदी रास्त किंमतीत सोलर पंप मिळवायचा आहे.
  • खुल्या प्रवर्गातील शेतकरी जर असतील तर त्यांना कुसुम सोलर पंप साठी 90 टक्के अनुदान भेटणार आहे, आणि जर शेतकरी हे अनुसूचित जाती जमाती किंवा मागासवर्गातील असतील तर त्यांना तब्बल 95 टक्के इतके  अनुदान लाभणार  आहे.
  • सोलर पॅनलपासून निर्माण झालेली वीज शेतकरी विकू शकतात.
  • वीज विकल्यानंतर मिळणारे पैसे नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता

  • कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ हा सर्व म्हणजेच मोठे, मध्यम, लघु, अल्प भूधारक या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे.
  • जे अर्जदार शेतकरी आहेत, केवळ त्यांना या कुसुम सोलर पंप चा लाभ मिळणार आहे.
  • यासाठी अर्जदार हा कोणत्याही खुल्या प्रवर्गातील, अनुसूचित जाती जमाती मधील असला तर त्याला फायदा मिळतो.
  • फक्त अर्जदाराच्या नावे जमीन आसावी, जर जमीन नावे नसेल तर या सोलर पंप योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • ज्या भागात किंवा शेतात वीज जोडणी अद्याप पोहोचली नाही, केवळ अशा शेतकऱ्यांना अनुदान भेटणार आहे. त्यामुळे शेताच्या जवळपास लाईट ची सुविधा असू नये.

कुसुम सोलर पंप योजने साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

  • दोन पासपोर्ट साइज फोटो.
  • आयडी पुरावा जसे की ड्रायव्हिंग लायसन्स/आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट.
  • पत्ता पुरावा जसे की मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड इ.

कुसुम सोलर पंप योजने साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्यांना केवळ ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करता येईल. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • जर शेतकऱ्यांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरता येत नसेल, तर शेतकरी ऑनलाईन केंद्रावर जाऊन कुसुम सोलर पंप योजनेसाठी फॉर्म भरू शकतात.
  • कुसुम सोलर पंप योजनेद्वारे तीन प्रकारचे सोलर पंप दिले जाणार आहेत. ते म्हणजे 3 HP, 5 HP आणि 7.5 HP असं सोलर पंप मिळणार आहे.
  • सोलर पंप मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे, त्यासाठी अर्जदार शेतकरी हे महाऊर्जा च्या अधिकृत वेबसाईट वरून खालीलप्रमाणे पायऱ्या (steps) वापरून ऑनलाईन अर्ज शकतात.

पायरी 1: प्रथम https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B  या पोर्टल वर यायचे आहे.   तुम्हाला या पोर्टलवर एक ‘लाभार्थी नोंदणी फॉर्म’ मिळेल, जिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि इतर संबंधित तपशील वापरून लाभार्थी म्हणून नोंदणी करावी लागेल.

एकदा तुम्ही लाभार्थी नोंदणी फॉर्म (स्थान/गाव) मध्ये आवश्यक माहिती भरल्यानंतर, सौर पंपांच्या क्षमतेनुसार (3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी) तुमच्या स्थानासाठी योजनेची उपलब्धता (कोटा) दर्शविणारी पॉप-अप विंडो दिसेल.

पायरी 2: तुमच्या स्थान/गावासाठी योजनेअंतर्गत कोट्याच्या उपलब्धतेवर अवलंबून, तुम्ही अर्ज फी भरून पुढे जाऊ शकता.कृपया आवश्यकतेनुसार अर्ज फी भरा. हा लेख लिहिताना अर्जाची फी रु. १५ होती. कृपया पेमेंटच्या वेळी पेमेंट फॉर्ममध्ये अचूक माहिती भरा. तुम्ही UPI, नेट बँकिंग किंवा ATM आणि क्रेडिट कार्डद्वारे फी भरू शकता.

पायरी 2- अर्ज फी भरल्यानंतर, तुमचा अर्ज स्वीकारला जाईल, आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएस (SMS) पाठवला जाईल. कृपया वन-टाइम-पासवर्ड (OTP) साठी एसएमएस चेक करा आणि पोर्टलवर प्रविष्ट करा (संदर्भासाठी कृपया खालील स्क्रीनशॉट तपासा).

पायरी 3: ओटीपी इनपुट केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या नोंदणीसाठी एक पुष्टीकरण विंडो दाखवली जाईल. तुमचा अर्ज क्रमांक, नाव, मोबाईल नंबर इ. या वेबपेजवर दिसतील.तुम्ही पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, तुम्ही कुसुम सौर पंप घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरू शकता.

पायरी 4: तुमचा अर्ज लॉग इन करण्यासाठी एसएमएसद्वारे तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरा आणि फॉर्म पूर्णपणे भरा (जसे की जमिनीचा तपशील इ.). अर्जाचा स्क्रीनशॉट तुमच्या संदर्भासाठी खाली दिला आहे.

पायरी 5: सर्व तपशील पूर्ण केल्यानंतर, शेतकऱ्याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे. अर्ज सबमिट केल्यावर, शेतकऱ्याला “यशस्वीपणे नोंदणीकृत” असा संदेश प्राप्त होईल. पोचपावती (Acknowledge) क्रमांक प्राप्त होईल.

महत्वाच्या तारखा

कुसुम सोलर पंप योजना ३१.०३.२०२६ पर्यंत कार्यरत राहणार आहे.या कालावधीत पत्र असणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

या योजनेसंदर्भात नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्रश्न-कुसुम सोलर पंप योजना साठी अर्ज कसा करायचा

उत्तर-  कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत महाऊर्जा पोर्टल वरून फॉर्म भरायचा आहे. त्याची सविस्तर माहिती वर दिली आहे.

प्रश्न-कुसुम सोलर पंप योजनेसाठी कोण पात्र आहे?

उत्तर- सोलर पंप योजनेसाठी केवळ शेतकरी पात्र असणार आहेत.

प्रश्न-कुसुम सोलर पंप योजनेद्वारे किती अनुदान भेटणार?       

उत्तर- सोलर पंप खरेदीसाठी 90 ते 95 टक्के इतके अनुदान मिळणार आहे.

प्रश्न-कुसुम सोलर पंप योजनेद्वारे लावण्यात आलेले solar panel किती काळ टिकतात?

उत्तर- या योजनेद्वारा लावण्यात आलेले solar panel हे २५ ते ३० वर्ष टिकतात.

आवश्यक सावधगिरीची बाब/सूचना

या  योजनेचा लाभ घेता यावा यासाठी केंद्र शासनाच्या महाऊर्जा च्या अधिकृत वेबसाईट वर दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावयाचे आहे. अटल सौर कृषिपंप योजना-१ व २ आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी पात्र नाहीत.

अधिक माहितीसाठी शासनाच्या https://mnre.gov.in/solar/scheme  या website ला भेट देऊ शकता किवा १८००-१८०-३३३३ या टोल फ्री क्रमांकावर सम्पर्क करू शकता.

माहितीचे स्त्रोत:

https://mnre.gov.in/solar/scheme

https://www.mahadiscom.in/solar/index.html

https://www.mahaurja.com/ASKP/login.php

https://pmkusum.mnre.gov.in/

author

प्राची राजूरकर

प्राची पर्यावरण शास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीधर असून त्यात संशोधन देखिल करीत आहे. याचबरोबर ती शिक्षणशास्त्रात पदवीधर असून कायद्याची देखील पदवीधर आहे. थोडक्यात सांगायचेच तर ती एक संशोधक, शिक्षण व कायदेतज्ञ आहे, आणि मुख्यत्वे ती वनीकरण क्षेत्रात निपुण असून एका जवाबदार पदावर कार्य करीत आहे. तिला विविध सरकारी योजनाबद्दलचे माहिती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचवायला आवडते जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी तसेच मोठ्या सामाजिक परीवर्तनासाठी फायदेशीर ठरेल.

Similar Posts

Comments

Leave a Reply