Agriculture

इथेनॉल उत्पादनात भारताची वाटचाल: संधी, स्थान आणि सावधगिरी

भारताने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे (Ethanol) 20% मिश्रण (E20) 2030 च्या उद्दिष्टापेक्षा पाच वर्ष आधी, म्हणजे 2025 मध्ये पूर्ण केलं आहे. पण इथेनॉल म्हणजे नक्की काय? ते कुठून आणि कशापासून तयार होतं? आणि इथेनॉल उत्पादनात भारताचा जागतिक स्तरावर काय दर्जा आहे? या लेखातून आपण हे सविस्तरपणे समजून घेऊया.

इथेनॉल म्हणजे काय?

इथेनॉल हा एक प्रकारचा जैवइंधन (biofuel) आहे. हे मुख्यतः ऊस, मका, गहू यासारख्या कृषी पिकांपासून तयार केलं जातं. रासायनिक दृष्टिकोनातून पाहता, इथेनॉल हे C₂H₅OH या सूत्राचं अल्कोहोल असून ते  इंधन, पेय, आणि औद्योगिक वापरासाठी उपयोगात आणलं जातं. इंधन म्हणून वापरले जाणारं इथेनॉल बहुतेक वेळा ९९% शुद्ध असतं आणि त्याला ‘anhydrous ethanol’ म्हणतात.

इथेनॉलचा वापर कशासाठी होतो?

  1. इंधन मिश्रणासाठी – इथेनॉलचा सर्वात मोठा वापर पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी होतो. हे मिश्रण प्रदूषण कमी करतं, आणि जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व घटवतं.
  2. औद्योगिक वापरासाठी – विविध रसायनं, रंग, औषधं तयार करताना इथेनॉल वापरला जातो.
  3. पेय उद्योगात – काही विशिष्ट प्रक्रियेनंतर इथेनॉलचा वापर मद्यनिर्मितीसाठी होतो.

इथेनॉलचं जागतिक उत्पादन

2024 साली, जगभरात 11,814 कोटी लिटर (31,210 दशलक्ष गॅलन) इथेनॉलचं उत्पादन झालं, आणि हे एक ऐतिहासिक उच्चांक ठरला. या उत्पादनात अमेरिका आणि ब्राझील हे दोन देश आघाडीवर असून, त्यांनी अनुक्रमे सर्वाधिक इथेनॉल उत्पादन केलं आहे. भारत या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे — 2024 मध्ये भारताने सुमारे 618 कोटी लिटर इथेनॉल (1,630 मिलियन गॅलन) उत्पादन केलं. तथापि, हे उत्पादन अजूनही अमेरिका (6,135 कोटी लिटर) आणि ब्राझील (3,321 कोटी लिटर) यांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. जागतिक इथेनॉल बाजारात भारताचा वाटा केवळ ५% इतकाच असूनही, त्यात वर्षागणिक वाढ होत आहे.

संदर्भ: Renewable Fuels Association – 2024

अमेरिकेत मका हे इथेनॉल उत्पादनाचं प्रमुख कच्चामाल आहे, तर ब्राझीलमध्ये ऊसावर आधारित इथेनॉल मोठ्या प्रमाणात तयार केलं जातं.   

भारतातील इथेनॉल निर्मितीची वैशिष्ट्ये

भारतात इथेनॉल प्रामुख्याने ऊसाच्या गाळपानंतर मिळणाऱ्या मळीपासून (molasses) तयार केलं जातं. काही प्रमाणात धान्य (grains) आणि इतर बायोमासपासूनही ते तयार केलं जातं.

उत्पादन पद्धती:

  1. Molasses-based Ethanol – ऊस गाळपानंतर उरलेल्या मळीपासून
  2. Grain-based Ethanol – तांदूळ, मका, ज्वारी यासारख्या धान्यांपासून
  3. 2G Ethanol – कृषी अवशेष, ऊसाचे पेंढ, लाकूड इ. पासून

राष्ट्रीय बायो-ऊर्जा कार्यक्रम (2022–2026)

भारत सरकारने 2022 मध्ये राष्ट्रीय बायो-ऊर्जा कार्यक्रम (National Bio Energy Programme) सुरू केला आहे, जो 2025–26 पर्यंत चालेल. यामध्ये जैवइंधनाला चालना देणं, ऊसाच्या मळ्यातील उरलेलं अवशेष, शेती कचरा, शहरातील सेंद्रिय कचरा यांसारख्या स्त्रोतांमधून ऊर्जा निर्माण करणं हे उद्दिष्ट आहे.

Related Post

या कार्यक्रमाअंतर्गत इथेनॉल, बायोगॅस, आणि बायो-CNG यांसारख्या इंधनांचे उत्पादन वाढवण्यासाठी वित्तीय अनुदान, तांत्रिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच यासारखी साधनं पुरवली जातात. त्याचबरोबर, ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणं, सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन सुधारणं, आणि हरित ऊर्जा उत्पादन वाढवणं हीही महत्त्वाची उद्दिष्टं आहेत.

सरकारचा दावा आहे की हा कार्यक्रम भारताच्या ऊर्जा स्वावलंबनासाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल. मात्र अंमलबजावणीत पारदर्शकता, कृषी धोरणांशी सुसंगती, पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास आणि शेतकऱ्यांना सहज प्रवेश हे घटक योग्य पद्धतीने हाताळले गेले पाहिजेत.

भारतातील काही प्रमुख इथेनॉल उत्पादक कंपन्या

भारतात इथेनॉल उत्पादन मुख्यतः साखर उद्योगाशी संबंधित कंपन्यांकडून केलं जातं. ऊस गाळप करून मिळणाऱ्या गाळपांपासून इथेनॉल तयार केलं जातं, ज्याचा वापर इंधनात मिसळण्यासाठी केला जातो. खाली काही नामांकित कंपन्यांची माहिती दिली आहे, ज्या भारताच्या इथेनॉल उत्पादन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत:

  • बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड (Balrampur Chini Mills Ltd.) – मुख्यालय: बलरामपूर, उत्तर प्रदेश
  • ई.आय.डी. पॅरी (इंडिया) लिमिटेड (E.I.D. Parry (India) Ltd.) – मुख्यालय: चेन्नई, तमिळनाडू
  • श्री रेणुका शुगर्स लिमिटेड (Shree Renuka Sugars Ltd.) – मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
  • त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड (Triveni Engineering & Industries Ltd.) – मुख्यालय: नोएडा, उत्तर प्रदेश
  • डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड (Dalmia Bharat Sugar and Industries Ltd.) – मुख्यालय: नवी दिल्ली
  • एचपीसीएल बायोफ्युएल्स लिमिटेड (HPCL Biofuels Ltd.) – मुख्यालय: पाटणा, बिहार
  • धामपूर शुगर मिल्स लिमिटेड (Dhampur Sugar Mills Ltd.) – मुख्यालय: नवी दिल्ली

या कंपन्या भारताच्या जैवइंधन धोरणात आणि 20% इथेनॉल मिश्रणाच्या राष्ट्रीय उद्दिष्टांमध्ये मोलाचा वाटा उचलत आहेत.

इथेनॉल मिश्रणाचे (E20) लक्ष्य: साध्य आणि प्रश्‍नचिन्हे

भारताने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल ब्लेंडिंग (E20) हे लक्ष्य २०२५ च्या आधी  साकार केले आहे (मूळत: २०३० चे होते).  तोपर्यंत इथेनॉल मिश्रणाचा दर २०१४ मध्ये फक्त 1.5% होता, तर २०२४ मध्ये तो २०% पर्यंत पोहोचला — म्हणजे अंदाजे १३ पटीने वाढ!  यामुळे ऊर्जा स्वावलंबन, परकीय चलन बचत, आणि शेतकरी उत्पन्न वाढ यासारख्या सकारात्मक परिणाम दिसून आले.

मात्र या बदलापासून काही नागरिकांमध्ये वाहनांचे मायलेज कमी होणे, जुन्या वाहनांचे इंजिनाचे नुकसान, आणि देखभालीसाठी वाढता खर्च या चिंताही निर्माण झाल्या आहेत.  काही कंपन्यांनी इथेनॉल धोरणामुळे प्रचंड नफा कमावला, आणि काहींच्या शेअर किंमतीत अचानक झपाट्याने वाढ झाली. उदाहरणार्थ, CIAN Agro या कंपनीचे शेअर काही महिन्यांत ७ पट वाढले आहेत. या कंपनीच्या संचालक मंडळात राजकीयदृष्ट्या कनेक्टेड शेअरहोल्डर यांचाही समावेश आहे, ज्यामुळे काही राजकीय विश्लेषकांनी धोरणात्मक पारदर्शकतेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर वेगवेगळ्या माध्यमांमधून चर्चा होत असल्याचे पाहायला मिळते.  (संदर्भ: Finshots लेख).

भारतीय सर्वोच्च न्यायालयाने E20 धोरणाविरुद्ध दाखल केलेली याचिका नाकारली आणि E20 लागू राहण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.  

इथेनॉल धोरणाचा यशस्वी व शाश्वत वापर हा फक्त उत्पादन वाढवण्यात नाही, तर त्याच्या परिणामांची चौफेर समीक्षा आणि सर्वसमावेशक रचना तयार करण्यात आहे. म्हणूनच, यापुढे सरकार, उद्योग आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करावं, जेणेकरून भारताचं जागतिक इथेनॉल नेतृत्व केवळ आकड्यांपुरतं न राहता, वास्तवातही परिपूर्ण ठरेल.   

प्रणाली तेलंग

प्रणाली AG मराठी ची संस्थापक आणि संपादक आहेत. ती कृषी, ग्रामीण विकास आणि शाश्वत जीवनावर ताज्या बातम्या आणि लेख लिहिते. तिने पर्यावरण शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील पूर्ण केला आहे. ती एक प्रशिक्षित शिक्षिकाही आहे. तिने 5 वर्षे शिक्षण, संशोधन आणि विकास क्षेत्रात काम केले आहे.

View Comments

Recent Posts

“Future of Jobs 2025” – ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने

भारताच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती जवळजवळ सारखीच असते. घरात शेती, पावसावर अवलंबून उत्पन्न, आणि शिक्षण म्हणजे आयुष्य बदलण्याची एकमेव… Read More

वाळवंटातली शेती: इराणच्या कृषी व्यवस्थेचा आढावा

आजच्या जागतिक घडामोडींमुळे इराण पुन्हा चर्चेत आहे. अर्थव्यवस्था, ऊर्जा संसाधने आणि भू-राजकारण या विषयांबरोबरच इराणच्या शेतीबद्दलही उत्सुकता वाढली आहे. पहिल्या… Read More

जागतिक मृदा दिवस: भारतातील माती, अन्नसुरक्षा आणि सेंद्रिय कार्बन घट

दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जगभरात जागतिक मृदा दिवस (World Soil Day) साजरा केला जातो. FAO आणि संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने सुरू… Read More